“
त्या पदरानेच मी प्रथम तुझे नवे कोवळे ओठ पुसले होते. त्या तुकड्यात आहे
आपल्या माजघरातील चिमूटभर माती! तुझ्या सदैव चाललेल्या दिंडीप्रवासात तुला
कधीतरी असह्य यातना होतील, परक्या जनांच्या गर्दीत तुला एकाकी वाटेल,
पायांतील शक्ती जाऊन ते केळीचे काले होतील, मन हताश होऊन आत सगळी राख भरून
गेल्यासारखं तुला वाटू लागेल. त्या क्षणी कदाचित झालीच तर तुला तुझी माय,
तुझी माती यांची आठवण होईल; कदाचित होणारही नाही. पण असला क्षण आलाच तर
तुझ्या सन्निध असावी म्हणून ही एक खूण आहे. आता जाते मी! तू घरापासून
अतिदूर आलास व तुझ्यामागोमाग मी देखील फरफरट इथपर्यंत आले; हा माझाही एक
वेडा प्रवासच होता. पण इकडे येतांना त्यात नैराश्याची तरी विलक्षण ओढ होती.
आता मी परतीच्या वाटेवर असताना माझा ऊर रित्या खळग्यासारखा राहील. परतीचा
प्रवास करताना नेहमीच उरात राख भरूनच यावं लागतं. पण प्रवासाला निघतानाच
यासाठी देखील मन घट्ट करून पाऊल उचललं पाहिजे. आता तू तुझ्या मार्गाने जा,
मी माझ्या परतवाटेने माघारी जाईन!”
-जी. ए. कुलकर्णी [रत्न (काजळमाया)]
No comments:
Post a Comment